NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- ‘युवा रक्षक’ने नांदेड महानगरपालिकेच्या अजब कारभारावर आणि इमरान कॉलनीतील कचऱ्याच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा मोठा विजय झाला आहे. या प्रश्नावर ‘युवा रक्षक’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच, प्रशासनाच्या स्वच्छता विभागात एकच खळबळ उडाली आणि अवघ्या काही तासांतच या परिसराचा कायापालट करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.
•बातमीचा मोठा प्रभाव
इम्रान कॉलनी आणि इकरा स्कूल परिसरातील कचऱ्याचे ढीग आणि साचलेली घाण यावर ‘युवा रक्षक’ने वस्तुस्थिती मांडली होती. नागरिकांना होणारा त्रास, वाढलेले डासांचे साम्राज्य आणि प्रशासनाची अनास्था यावर या बातमीद्वारे परखड टीका करण्यात आली होती. या बातमीची गंभीर दखल घेत नांदेड महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
•स्वच्छता विभाग सक्रिय, कचऱ्याचे ढीग उचलले
‘युवा रक्षक’च्या बातमीचा प्रभाव असा की, ज्या स्वच्छता निरीक्षकांकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नव्हता, तेच अधिकारी आता स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज सकाळी महापालिकेच्या स्वच्छता पथकाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने इमरान कॉलनीतील कचऱ्याचे सर्व ढीग उचलले आहेत. रस्ते आणि इकरा हायस्कूल परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, आरोग्याचा धोका टळल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
•नागरिकांकडून ‘युवा रक्षक’चे आभार
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी महानगरपालिकेचे उंबरठे झिजवूनही काहीही होत नव्हते, ते काम ‘युवा रक्षक’च्या एका बातमीमुळे तातडीने मार्गी लागले. “आम्ही हताश झालो होतो, पण ‘युवा रक्षक’ने आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला, त्यामुळेच हा प्रश्न सुटला,” अशा शब्दांत स्थानिक रहिवाशांनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘युवा रक्षक’च्या या सकारात्मक हस्तक्षेपामुळे पुन्हा एकदा पत्रकारितेची ताकद सिद्ध झाली आहे. आता या परिसराची नियमित स्वच्छता राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



