NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड, [30 ऑगस्ट, 2025] :– नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
बिलोलीमध्ये झाडावर अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश.
आज सकाळी बिलोली तालुक्यातील टाकळी खुर्द येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीला स्थानिक प्रशासनाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. तलाठी अटकळी यांनी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) क्रांती डोंबे यांना एका व्यक्तीच्या वाहून जाण्याबद्दल माहिती दिली. या व्यक्तीने मन्याड नदीच्या पुरात वाहून जाताना एका झाडाचा आश्रय घेतला होता. माहिती मिळताच एसडीओ क्रांती डोंबे यांनी नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घटनास्थळी पाठवले. या पथकाने बोटीच्या मदतीने मारोती हनमंत कोकणे (रा. वझरगा) या व्यक्तीला वाचवले.
या बचावकार्यात मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, ग्राम महसूल अधिकारी प्रणिता काळे, शिवाजी घोंगडे, चव्हाण , ललित पाटील, मिलिंद सुपेकर, बीट जमादार काळे, पोलीस प्रशासन, तसेच टाकळी गावाचे सरपंच , गावकरी आणि अटकळी गावातील ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
कुंचेली, नायगांव येथे CRPF जवान यांनी ८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
नायगांव तालुक्यातील कुंचेली गावात पूर आल्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) मदतीने प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आणि आतापर्यंत सुमारे ८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
जिल्ह्यात मदत कार्य आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पूरग्रस्त भागांवर लक्ष ठेवून असून, नागरिकांना मदतीसाठी आवाहन करत आहेत.