5 C
New York
Friday, February 27, 2026

Buy now

spot_img
spot_img

“नांदेड महापालिकेचा झोपेच सोंग : इमरान कॉलनी कचऱ्याच्या विळख्यात; स्वच्छता निरीक्षकांचा पत्ता नाही!”

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड :- नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील इमरान कॉलनी आणि इकरा हायस्कूल परिसरात सध्या कचरा आणि घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात सगळीकडे डासांचे (मच्छर) साम्राज्य निर्माण झाले असून, एखादी मोठी साथ पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

•रस्त्यावर कचरा, नाल्या तुंबल्या

इमरान कॉलनीतील अंतर्गत रस्ते सध्या कचरा डेपो बनले आहेत. कचऱ्याचे मोठे ढीग रस्त्यावरच साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई न झाल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावर वाहत असून त्यातून येणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणेही मुश्कील झाले आहे.

•स्वच्छता निरीक्षक आहेत कुठे? नागरिकांचा सवाल

या भागातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या स्वच्छता निरीक्षकांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेकदा स्वच्छता निरीक्षकांना फोन केले, तक्रारी केल्या आणि कचऱ्याचे फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठवूनही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. “स्वच्छता निरीक्षक नक्की आहेत तरी कुठे? ते कामावर आहेत की नाही?” असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. तक्रारी करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

•डासांचे साम्राज्य; लहान मुलांचे आरोग्य धोक्यात

परिसरात इकरा हायस्कूल ही शाळा आहे. शाळेच्या अगदी जवळच घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिकडे तिकडे डासांची पैदास वाढल्याने परिसरात ‘मच्छरराज’ सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे लहान मुलांना मलेरिया, टायफाईड आणि डेंग्यू सारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

•प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, आता थेट महानगरपालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. स्वच्छता निरीक्षकावर कारवाई करून या भागातील कचरा तात्काळ उचलला जावा आणि जंतुनाशक फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली आहे. जर लवकरच उपाययोजना झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा इमरान कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या