NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद :- नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत लोककल्याणकारी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी धर्माबाद तालुक्यातील चोंडी चोळाखा गावातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्यासाठी त्यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच, नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही तात्काळ मदतकार्य सुरू करण्यासाठी सांगितले आहे.
यावेळी कवळे गुरुजींनी पूरग्रस्त शेतकरी आणि गावकऱ्यांना धीर देत, सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले. या संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.